Sunday, April 19, 2020

माई (भाग 2)
रत्नागिरी जिल्ह्याचा आत्मा, हुजूरपागा मुलींच्या शाळेतील शिक्षण आणि एकूणच त्या 'पूर्वीचे पुणे राहिले नाही' असे सतत म्हणणाऱ्या पिढीचे वंशपरंपरागत चालत आलेले संस्कार म्हणजे माई. तिच्याकडे जायचे म्हणजे कधीही जाऊन चालायचे नाही. घराबाहेर कधी यावे आणि जावे अशी पाटी जरी लिहिलेली नसली तर काही अलिखित दंडक होते.
दुपारी 12 ते 4 आणि संध्याकाळी 8 नंतर उगाच कुणी घरी आलेलं तिला विशेष आवडत नसे. रात्रीचे जागरण ही गोष्ट तिच्यासाठी अब्रम्हण्यम सदरातील होती. रात्रीची वेळ ही भुतं, पिशाच्च यांच्या कामकाजाची असते आपण माणसं आहोत आपल्याला जागे राहायच्या वेळा आखून दिलेल्या आहेत असे तिचे मत होते. लवकर निजे लवकर उठे... या उक्तीला माई आयुष्यभर जागली.
एकदा तिच्याकडे मुक्कामी असताना सकाळी 9 वाजता मी उठलो यावरून तुम्ही मुंबईकर म्हणजे एक नंबरचे आळशी, कोवळं ऊन अंगावर आल्यावर तुम्हाला जाग येत नाही, पार्श्वभाग चटक्यांनी लाल झाला की तुमचे डोळे उघडणार. त्यावर मी एवढ्या पहाटे उठून कुठे सत्यनारायण करायचा एवढंच म्हणलं, तर म्हणे तेव्हा तरी पहाटे उठता की त्या सत्यनारायणाच्या दुपारच्या झोपेची वेळ झाल्यावर कथा वाचायला घेता? असा युक्तिवाद व्हायचा.
डोंबिवलीकर मंडळींची एक खासियत आहे ती म्हणजे डोक्यावर पंखा सुरू असलेला दिसल्याशिवाय त्यांना झोप लागत नाही. ती आमची डोंबिवलीची भाची प्राजक्ता, तुझीच बहीण, बाहेर बर्फ जरी पडत असला तरी अंगात 4 स्वेटर घालून, एक पांघरूण आणि ब्लॅंकेट घेईल पण पंखा 1 वर तरी चालू ठेऊनच झोपेल. हे माझे नव्हे तर तिचे observation. बऱ्याच अंशी ते खरेही आहे. पंखा ही फक्त मार्च ते मे हे तीनच महिने लागतो असे तिचे प्रांजळ मत. पण उन्हाळा आणि पावसाळा असे दोनच ऋतू माहिती असलेल्या डोंबिवलीकरास अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत त्या निवाऱ्यात पंखा ही एक मूलभूत गरज आहे हे तिला कधी पटले नाही.
पुण्याच्या पलीकडे त्याहूनही पंधरा वीस पेठांच्या बाहेर रम्य आकर्षक असं जगात काही असू शकत यावर तिचा विश्वास नव्हता. लकडी पुलाच्या पलीकडे असलेलं पुणं म्हणजे टॉवरमध्ये गुप्तपणे राहणाऱ्या निर्वासित पांढरपेशा मंडळींचा रेफ्युजी कॅम्प. नुसतं पत्त्यापुढे ४११ च्या कोणतेही तीन आकडे खरडले म्हणजे पुणेकर झालो आपण असे प्रत्येक माणूस समजतो हे तिचे मत.आज हॅपनिंग मानल्या जाणाऱ्या 'कोथरूड' या भागाचे पुण्याच्या भौगोलिक क्षेत्रामधले अस्तित्व तिने साधारण एक दशक ओलांडल्यावर मान्य केले
कोकणात तिची वडिलोपार्जित जमीन होती, लाल माती, ते शेणाने सारवलेल्या जमिनीचे घर, माडी,पडवी, ओसरी, तुळशीवृंदावन, अंगणात हापूस वगैरे टिपिकल सगळं होतं पण त्या सगळ्यावर अनेक भावंडांचे दावे होते. बरं बालपण पुण्यात गेल्याने तिला तिथली विशेष ओढही नव्हती वा तिटकाराही नव्हता. तिला तिथल्या मातीशी जिव्हाळा नक्कीच होता, पण मालमत्तेच्या वादात भावंड मनाने दुरावली असल्याने बोलण्यातून अगतिकता कायम जाणवे
होळीला, रामनवमीला, एकादशीला होणारे उत्सव, त्यातील कीर्तन, महाप्रसाद वगैरे यथेच्छ वर्णनं तिच्याकडून मी ऐकली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण रिक्षा तिला फार आवडायच्या. एखाद्या नव्या नवरीला सजवावे तसे कोकणातील रिक्षावाले आपल्या रिक्षाला सजवतात हे मला सर्वप्रथम तिने सांगितले. कोकणात घर असलेल्या अनेक मित्रांकडून हे मला अजूनही ऐकायला मिळते. भगवान परशुराम कधीतरी आमच्यावर प्रसन्न होवो आणि हे सगळं अनुभवायची संधी आम्हाला ते देवो ही इच्छा.
बहुतांश लोकांप्रमाणे तिला आंबा या फळाचे सर्वाधिक आकर्षण. सुनेला जसा माहेरचा पाहुणा घरी येणार ह्या कल्पनेनं भरून येतं तशी तिला मार्च महिन्यात मंडईत कैऱ्या दिसल्यावर होत असे. मग कोकणात गावी तिकडे जोगळेकर का केळकर यांना फोनाफोनी सुरू व्हायची. आगाऊ बुकिंग करून ठेवतेय, दुसऱ्या कुणाला पेटी पाठवली तर याद राखा असा तिचा सज्जड दम होता. हवं तर या महिन्याला किराणा कमी भरू पण आंबा हा किमान दोन महिने वास्तव्याला असला पाहिजे असे तिचे मत. गोखले कुटुंबाच्या घराच्या ओसरीवर उन्हाळ्यात कायम रिकाम्या आंब्याच्या पेट्या व्यवस्थित ठेवलेल्या दिसायच्या. मध्येच फटीतून गवत बाहेर येतंय, चुरगळलेला पेपर अस्ताव्यस्त पडलाय असे नाही.
अगं माई, तुला डायबेटीस आहे, आंबे कसले खातेस? असं विचारलं की आयुष्यात एकच गोष्ट चवीने खावीशी वाटते तेही दोनच महिने मिळते, खड्डयात गेली ती तुमची डायबेटीस. सलाईन मधलं ग्लुकोस खाऊन जाण्यापेक्षा वर जाण्यापेक्षा आंबे खाऊन गेलेलं परवडेल. मग हा प्रतिवाद ऐकून अण्णा गोखले म्हणायचे, पुलं अंतू बर्व्याला पाहून नव्हे तर हिला पाहून म्हणाले असतील की एरवी साखर हिच्या जिभेवर कधी नाही पडली पण रक्तात मात्र हमखास पडली. असुदे असुदे. जिभेतुनच रक्तात जाते साखर असे त्यावर उत्तर यायचे. हे सगळे हुजूरपागा शाळेचे विद्यार्थी असलेच का ? असे अण्णा हळूच कानात सांगून हसायचे
एकदा तिच्या कोणा एका परदेशी नातेवाईकाने आंब्याचा रस मिक्सरमध्ये काढला असे फोनवर बोलताना कळवले. त्यावर तिचं पित्त जे खवळलं. आंब्याचा रस हाताने कसा काढावा, का काढावा ह्यावर तिने अर्धातास तिला सुनावलं. माणूस म्हणून तुम्ही जगण्याच्या लायकीचे नाही हा शेराही तिने मारला. अण्णा म्हणाले, जाऊदे गं ती काही का करेना, तू कशाला शाळा घेतलीस तिची? माईचे उत्तर एपिक सदरात मोडणारे होते. एवढी वर्षे संसार झाला तरी तुम्हाला मी कळले नाही हो, खुळेच आहात. कॉल इनकमिंग होता, आपल्या बिलात पैसे का लागणार आहेत. स्वतः एवढे कष्ट घेऊन अमेरिकेला फोन करण्याची हौस मला मेली कुठली?
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
(क्रमशः) #MaaiGokhale
©ODJ
माई

नातं निर्माण व्हायला काही कारण लागत नाही. माझ्या मते ‘व्हेवलेंथ’ ही गोष्ट त्याकरता पुरेशी आहे. काही व्यक्ती अशा असतात की ज्यांच्या नात्याचं काही बारसं करताच येत नाही. कारण ती रक्ताची नसतात. रक्तापलीकडे असलेल्या पण त्याची वीण रक्ताच्या नात्याएवढी घट्ट असलेल्या नात्याला नाव आपल्याला देत येत नाही. हे असं बेनामी नातं मात्र मायेचा प्रेमाचा एक सुंदर सुगंध देतं, जो दिसत नाही पण त्याचा फील नक्कीच येतो.
जन्मल्यापासून चित्पावन ब्राम्हण समाजाशी आणि पुणे शहराशी माझं एक विशेष नातं आहे. वास्तविक या शहराशी आणि चित्पावन मंडळींशी जोडलेली नाळ अजूनही कायम आहे पंचवीस एक वर्षांपूर्वी जेव्हा शाळकरी मित्र उन्हाळी सुट्टीत कोकणात जायचे, पण मी एकटाच इसम असायचो जो पुण्यात जाई.
नातेवाईक मंडळींकडे राहून वगैरे आलं की एक चक्कर व्हायची ती जगप्रसिद्ध अशा पुण्यातील बर्म्युडा ट्रायंगल असलेल्या सदाशिव, नारायण, शनिवार पेठ या भागात. त्यातील सदाशिव पेठ ही वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणल्यास वावगं ठरू नये. पुलंनी म्हणल्याप्रमाणे एखाद्या सुरकुत्यानी फुललेल्या म्हातारीने भरतनाट्यमची पोज घेऊन उभे राहावे तशी दिसणारी काही घरं पुण्यात होती. तसंच काहीसं ‘गोखले’ कुटुंबाच्या घराची इमारत. अरुंद जिन्यातून तीन मजले खाली वर केल्यावर माणूस सिंहगड चढायला कुरकुरणार नाही.
मंजुषा उर्फ माई गोखले ही बाई 70च्या पुढे असली काही थकलेली, कमरेत वाकलेली अजिबात नव्हती. अतिशय गृहकर्तव्यदक्ष, काटेकोर, शिस्तप्रिय आणि तोंडाने फटकळ होती. घारे डोळे, गोरीपान कांती, सडपातळ अशी ती सतत टवटवीत आणि कायम काहीना काही उद्योगात गुंतलेली असायची. विश्रांती ही गोष्ट फक्त शारीरिक गरज म्हणून तिच्यासाठी होती. मनाला ते मान्य नव्हतं. तोंडाचा पट्टा हा अखंड सुरू असायचा. घरात कुणी असलं तर त्याच्याशी बोल नाहीतर घरात काम करताना एकटं बडबडणे किंवा काहीतरी सतत गुणगुणत बसायची. गप्प बसून काही करणे हे तिच्यासाठी निषिद्ध असावं.
माईचे यजमान केशवराव उर्फ अण्णा गोखले हे थोडे विरुद्ध पठडीतील. एकरांती चित्पावन असून सुद्धा देशस्थ ऋग्वेदी कुळाच्या जवळ जाणारा स्वभाव. मृदू बोलणे, वेंधळेपणा हा त्यांचा स्थायी भाव. घरात यावरून माई आणि त्यांचे प्रेमाचे संभाषण सतत सुरू असायचे. “त्या मंडईतला भाजीवाल्याला आपण काय दत्तक घेतले का हो? 3 रुपये किलो बटाटा असताना तुम्ही 5 रुपये त्याला देऊन आलात. आपल्या पूर्वजांनी मनीप्लांटच लावलाय हो अंगणात, त्याचा वेल वाढून आपल्या खिडकीतून आत आल्यासारखे तुम्ही पैसे उधळताय”. वैकुंठाला जाताना चार पैसे हाताशी असुद्या नाहीतर डायरेक्ट ओंकारेश्वरलाच न्यावे लागेल”.
20 22 वर्षांपूर्वी आमच्या वडिलांसोबत त्यांच्याकडे गेलो असताना अथर्वशीर्ष म्हणून दाखव अशी दमदार आज्ञा माईकडून आली. वडिलांच्या शिकवणीचा कस लागण्याची पहिलीच वेळ कदाचित आल्याने, आता हा काय म्हणतोय या टेन्शनने भर डिसेम्बर महिन्यात त्यांच्या कपाळावरून ओघळणारा घामाचा थेंब अजूनही आठवतोय. सुदैवाने मी व्यवस्थितपणे अथर्वशीर्ष म्हणून दाखवले आणि गोखले कुटुंबीयाच्या चेहऱ्यावर कौतुकाचे भाव उमटले. बिदागी म्हणून आजोबांनी दिलेले 11 रुपये आणि उच्चार अगदी स्पष्ट आणि शुद्ध हो लेकाचे तुझ्या दिलीप असं म्हणत माईंनी दिलेली चितळेची आंबा बर्फी अजूनही माझ्या स्मरणात आहे. त्या 11 रुपयांच्या बिदागीचे मोल माझ्यासाठी हल्लीच्या भाषेत वर्थ मिलियन डॉलरस होते.
सत्यनारायण पूजेला गव्हाऐवजी तांदूळ मांडले तरी चालतात हा साक्षात्कार माईमुळे झाला. आमच्या कोकणात तांदूळ पिकतो, तुझ्या देशावर गहू म्हणून तुम्ही गहू तर आम्ही तांदूळ ठेवतो इतकं स्पष्ट विवेचन तिने केलं. कुळीथ नावाचा खाद्यपदार्थ असतो हे मला माईने मला वयाच्या 16 व्या वर्षी दाखवले. चणाडाळी ऐवजी पिठलं हा पदार्थ कुळथापासून सुद्धा बनतो हे मला नव्याने कळले.
फणसातील अठळी ही फक्त गरे खाऊन कचऱ्यात टाकायला देवाने निर्माण केलेली नाही असे माईचे वाक्य मला आजही आठवते. त्यानंतर मी अठळी कचऱ्यात आजतागायत टाकायची हिंमत केलेली नाही. सुपारीचे तुकडे हे विळी किंवा सुरीने चिरून होत नाहीत तर त्यासाठी अडकित्ता नावाचं शस्त्र मी पेठेतील या गोखल्यांच्या घरातील एका पेटीत सन्मानाने ठेवलेलं पहिल्यांदा पहिलं. मीठ लावून उन्हात गरम केलेल्या जांभळाची अवीट चव मी प्रथम माईमुळे अनुभवली.
तांदळाची सालपापडी नावाचा प्रकार मी तिच्या हातचा पहिल्यांदा खाल्ला. माईकडे उदरभरण करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक होते. बाहेरच्या तिखट आणि चमचमीत खाण्याची सवय असलेल्या मला माईच्या पद्धतीच्या अशा तुलनेने अळणी आणि सपक स्वयंपाकाशी जुळवून घेणे जड जायचे. अर्धी बरणी तिखट नरड्यात घातलं की जेवण जात नाही का तुला ओंकारा. मिरचीचा व्यापार करणाऱ्याचीच मुलगी आण हो. घालील तुला दिवसरात्र मिरच्या खायला.
हल्लीच्या जमान्यात पौष्टिक पण नॉन ग्लॅमरस सदरात गणल्या जाणाऱ्या भाज्या हमखास मंडईतुन ती आणायची. लाल माठ, दोडका, शेपू, भोपळा, अंबाडी, सुरण वगैरे मला न आवडणाऱ्या भाज्या हमखास ती माझे आगमन झाल्यावरच घेऊन यायची. माईपुढे माझा आवाज चालत नाही हे ओळखून कदाचित मातोश्री तिच्याशी मुद्दाम संगनमत करून ह्या भाज्या माझ्या नरड्यात कोंबायचा प्लॅन बनवत असावी असा संशय मला कायम येई.
(क्रमशः) #MaaiGokhale
लेख मोठा होत असल्याने कंटाळवाणा होऊ नये म्हणून या भागावरील वाचकांच्या प्रतिक्रिया पाहूनच पुढील भाग पोस्ट केला जाईल.
©ODJ