Tuesday, October 11, 2016

कॉफी
@9am, Shivajinagar Stn by Indrayani. Catch u
there. असा मेसेज मित्राला टाकून तो घरातून निघाला. उठायला जरा उशीर झाल्याने, पटापट आवरल. बाहेर पाऊस होता, पहाटे 6 वाजता गडद अंधार होता. मध्येच ढगांचा गडगडाट झाला. तो थोड़ा बावचळला. मनात एक आठवण हलका स्पर्श करून गेली. पण लगेच तो घरातून निघाला आणि अर्ध्यातासात कल्याण स्टेशन गाठलं. 6.35 ला इंद्रायणी आली. Chair car boogie मध्ये आपली सीट शोधली आणि तो बसला. किती वर्षांनी पुण्याला जात होता तो. एक आतुरता होती, त्या शहराची, त्या मित्रांची, त्या दिवसातल्या आठवणीची.
गाड़ी सुटली, बाजुच्या सीटवर अजुन कुणी आलं नव्हतं म्हणून त्याने sack सीटवर ठेवली. अंबरनाथ गेल्यावर अचानक एका बाईचा आवाज ऐकू आला, 'क्या भैया, दो रुपया छुट्टा नही है ? नही है मेमसाब, अभी तो धंदा सुरु हुआ है. मुझे 2 रूपये वापीस चाहिये, तुम धंदा करता है तो छुट्टा रखना तुम्हारा कर्तव्य है. एक तो यह कॉफी कितनी पांचट है, पाणी बिलकुल(भैयाने पांचट शब्द पहिल्यांदा ऐकल्याने ती दाद की शिवी हे समजत नाही). रुकिये, आप बैठिये तो सही, हम आगे किसीसे लेके देदेंगे मेमसाब. मुझे अभी देदो, आप नही आये तो मैं किधर शोध लेते बैठू आपका. तेवढ्यात भैया कुठल्यातरी खिशात हात घालतो आणि 2 रूपये त्याला सापडतात. देखा ना, तुमको देनेकी इच्छा नही थी, इधरसेही करप्शन है, वो अकेला मोदी क्या क्या करेगा? भैया पळ काढतो. ती नाण पर्स मध्ये टाकते. Excuse me, is this ur bag? This is my seat. तो पेपरातून डोकं काढतो आणि बघतो तर काय..... गार्गी.
तो sack वर टाकतो, तिने ह्याच्याकड़े पाहिलेलच नसतं, ती करप्शन केस मधून बाहेर आलेली नसते. ती बसते आणि केस सावरायला लागते. फिकट गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस, ईयरिंग्स, पावसात भिजलेले ओले केस, गोरया चेहऱ्यावर घामाचे ओघळ, भैयाशी वाद त्यामुळे चीड़चीडे भाव, आणि सानुनासिक परंतु सुस्पष्ट उच्चार. एवढ्या' वर्षांनी अजूनही राष्ट्र भाषेची दुर्दशा आहे लोकांची'. तो पेपरात डोकं घालून तिला ऐकू जाईल अशा बेताने बोलतो. तिला हे वाक्य परिचयाचे असल्याने ती चमकून त्याचा पेपर बाजूला करते. Oh freak, केदार!!! केदार देशपांडे..येस. दोघ काही सेकंद नुसते एकमेकाकड़े पाहत बसतात. पहाटे त्याच्या मनात काही क्षण मनात चमकलेली आठवण!! चक्क त्याच्या समोर. ते पुणे, ते फर्ग्युसन कॉलेज, तेव्हाचे दिवस, आणि गार्गी. फर्ग्युसनच त्या दिवसातील सेन्सेशन. जिच्यावर तिच्याच काय पण कॉलेजमधील बाकी department मधल्या शेकडो मुलांनी आपले दिल तिच्याकरता कुर्बान केली अशी त्याची 'बेस्टी' गार्गी पटवर्धन.
तेव्हाच्या चवळीच्या शेंगेचा आता बर्यापैकी कोबीचा गड्डा झाला होता, कपाळावर चक्क ठिपक्याएवढी काळी टिकली. आणि गळ्यात मंगळसूत्र.
इथे कुठे? पुण्याला जातोयस? (टिपिकल मुलगी. पुण्याच्या गाडीत बसलेल्या माणसाला पुण्याला जातोयस का विचारायच) नाही, दिल्लीला जातोय. तिच्या घार्या डोळ्यांत निखारे पेटतात, तुला सरळ बोलता येत नाहीच का अजुन? तुला तरी हिंदी कुठे येत अजुन? दोघेही मनमुराद हसतात. तू मुंबईत कशी? क्लाइंट मीटिंग होती रेनिसांस पवईला, कल्याणला रात्री मावशीकडे राहिले आणि आता back to pavilion. What about you? (फर्ग्युसनची अमृता खानविलकर हे नाव तिच्या मातृभाषेवरील प्रभुत्वामुळे त्या काळी तिला पडल्याची आठवण त्याच्या मनात येऊन गेली) मित्राचं लग्न आहे कोथरुडला. कूल..जनरल चौकश्या झाल्यावर काही मिनिटे शांतता पसरते. दोघेही अस्वस्थ झालेले असतात, मनात आठवणींचें काहूर थैमान घालत असते.
दोघांना एकमेकांवरुन चिडवणे, गैंग आणि त्याहून प्राचार्य मंडळीमध्ये यांच लपून छपुन लफड चाललय अशा चर्चा, लायब्ररीमध्ये एकत्र काढलेल्या नोट्स, वैशाली, रूपाली, वाड़ेश्वरचा दाक्षिणात्य नाश्ता, नाइटआउटला गारठ्यात कोथरुडच्या अमृततुल्य मध्ये प्यायलेला वाफाळलेला चहा. सिंहगडावरील पीठलं भाकरी, बालगंधर्वला पाहिलेली नाटकं, त्यातील काही प्राज्ञ मराठीतील तिला बाउंसर गेलेले संवाद इत्यादी असंख्य आठवणी उफाळून आल्या. मग घोडं अडलं कुठे? गोष्टी पुढे गेल्या का नाहीत? गोम काय होती नेमकी?
दोघेही वाट बघत राहिले. कुणीतरी पुढाकार घेईल. तिचा इंदिरा गांधी आणि त्याचा राज ठाकरे बाणा असल्याने हे होत नव्हतं. कोण कोणाचा कसा किमान शब्दात कमाल अपमान करू शकत ह्याची अलिखित स्पर्धा दोघात कायम असायची. पण दोघेही खिलाडूवृत्तीने ते स्वीकारायचे. ह्या स्पर्धेत तिसऱ्या कुणाला एंट्री नव्हती. ते त्यांचं विश्व होतं, संवाद तिखट जरी असले तरी त्यात हवाह्वासा गोड़वा होता. तो त्यांच्या मैत्रीचा इसेन्स होता. पण एकमेकांच्या आडमुठ्या स्वभावाने, आणि ईगो मुळे दोघेही शिक्षण झाल्यावर दोन गाड्या वेगळ्या दिशेला जाव्या तसे गेले. हा मुंबईला घरी परत आला. तिने नंबर बदलला. नोकरी धरली आणि एका आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या मुलाशी लग्न केलं. ह्याच्या घरचे वधूसंशोधनात व्यग्र आहेत आणि हा नोकरीत
लोणावळा येतं .कॉफी? 2 कॉफी देना. या वेळी भैया वेगळा होता. सुट्टे काढून ठेवतो नाहीतर परत करप्शनवर भाषण ऐकायला मिळेल. How rude. U know...म्हणूनच मी तुला विचारलं नाही. ती पटकन बोलून गेली. तुला माझ माकड़ करता आलं नसतं म्हणून दुसरं काय? घार्या डोळ्यांत परत निखारे पेटतात. कुचका मेला!! पुण्यात किती दिवस आहेस? उद्या संध्याकाळी इंद्रायणीने परत. नंबर दे address whatsapp करते. Tomorrow's morning coffee at my place. विचारत नाही सांगतेय. 9am sharp. लेट झालास तर परत दूध गरम करणार नाही मी आधीच सांगते. काहीवेळ परत शांतता. खड़की आल्यावर दोघांची एकमेकांच्या माणसांशी फोनफोनी होते. शिवाजीनगर येतं. ती विचारते कॉफी? फटाफट? आता दोघांकड़ेही सुट्टे नाहीयेत सो मी आज जमा करतो तसेही उद्या तुला द्यावेच लागतील की कॉफीचे. दोघेही मनमुराद हसतात आणि एकमेकांचा निरोप घेतात
©ODJ

Tuesday, August 26, 2014

किल्ले राजमाची- एक अविस्मार्णीय अनुभव

पावसाळा म्हणलं की ट्रेकिंग साठी आदर्श काळ. कॉलेज मध्ये असताना ट्रेकिंग चा भरपूर आनंद लुटायला मिळत होता. पण नोकरीच्या रहाटगाडग्यात रविवार हा हक्काच्या झोपेचा वार झाल्याने 'ट्रेक्स' या गोष्टीपासून जवळपास ३ वर्षे दुरावा निर्माण झाला होता. आजूबाजूचे मित्र बर्याचदा ट्रेक्सला जायचे, सुरुवातीला २-३ वेळा बोलावले पण माझी नकारघंटा कायम राहिल्याने बोलावणे हळूहळू बंद झाले. तरीही एखादा ट्रेक करायचा कित्येक दिवसांपासून मनात होते आणि निमित्त झाले नितीश बापटने आयोजित केलेल्या २३-२४ ऑगस्टला 'किल्ले राजमाची' चे. राजमाची हे ट्रेकर्सचे पावसाळ्यातील एक  आवडते ठिकाण.  मुळात नितीश बापट हा अत्यंत passionate ट्रेकर म्हणून सुप्रसिद्ध आहे, त्याच्या या passion ची मटा सारख्या पेपरने मागील वर्षी दखल घेतली. त्यामुळे त्याच्याबरोबर एक ट्रेक करायची इच्छा मनात होती. तसेच आमच्या खास Galaxians ग्रुप(हर्षद नवाथे, निखील दुराफे, बापट बंधू ) इतर सदस्यही या ट्रेक ला येणार असल्याने अजूनच उत्साहात भर पडली. साधारण ३ वर्षाने ट्रेक करत असल्याने काहीही सामान माझ्याकडे नव्हते. अगदी 'ट्रेकिंग शूज', टी शर्टस इत्यादी गोष्टींची खरेदी करण्यापासून तयारी होती. ती मी कशीबशी केली आणि ट्रेकला जाण्यास सज्ज झालो.

साधारण ७ च्या सुमारास आम्ही सर्व डोंबिवली स्टेशनला भेटलो. एकूण १८ जण या ट्रेकला येणार होते. त्यातील काही लोकांशी माझी ओळख असल्याने परिचयाचा अडसर आला नाही. तसेच आमचे पुण्याचे दोस्त नचिकेत पुरोहीत हेही येणार कळल्याने आनंदात भर पडली. ७.०८ च्या कर्जत लोकल ने आम्ही कर्जत गाठले. १५-२० मिनिटे चहा नाश्ता केला. आणि साधारण ८.४५ च्या सुमारास डेक्कन एक्स्प्रेस कर्जतला आली. त्यात आम्ही शिरलो. मी आणि हर्षदने गाडीच्या दरवाज्यात ठाण मांडले व लोणावळा येईपर्यंत मनसोक्त जुनी हिंदी गाणी गायलो. साधारण ९.४५ च्या सुमारास डेक्कनने लोणावळा गाठले. लोणावळ्यात एका हॉटेलात नाश्ता झाल्यावर आम्ही किल्ले राजमाचीच्या मार्गाला कूच केले

लोणावळ्यातील तुंगार्ली गावातून किल्ले राजमाचीकडे रस्ता जातो. सुरुवातीला डांबरी रस्ता नंतर किंचीत कच्च्या मातीचा अशाप्रकारे कोणतीही अवघड patch नसलेला रस्ता होता. मध्ये एका धबधब्यावर भिजण्याचा आनंदही आम्ही घेतला. खूप दिवसांनी T shirt, trackpant, hevay Sack, Trekking shoes इत्यादी घेऊन चालताना एक वेगळंच फिलिंग येत होतं. २ तास मजल दरमजल करत आम्ही थोड्या उंच पठारावर दुपारच्या जेवणाकरता थांबलो. ती जागा अत्यंत नयनरम्य होती. समोर धबधब्यावर एक ग्रुप  Waterfall rapelling करत होता. एका बाजूला हिरव्यागार गवताची जणू दुलईच पसरली होती. तिथे आम्ही सर्वांनी मनसोक्त फोटो काढले. जेवण झाल्यावर आम्ही पुढच्या मार्गाला लागलो. साधारण २.३०-३ तास चालल्यावर राजमाची गडाच्या प्रवेशद्वारापाशी पोहचलो. जिथे आम्ही त्या रात्री वास्तव्य करणार होतो त्या गावाला 'उधेवाडी' असे म्हणतात. पुणे वनविभाग या भागात ५ रुपये प्रवेशशुल्क घेते. तिथून आत गेल्यावर एका नयनरम्य पोइंट वर आम्ही थोडावेळ विसावा घेतला. तिथे लिंबू सरबताचा आस्वाद घेतला. तिथून पुढे मजल दरमजल करत उधेवाडी मध्ये 'श्री वरे' यांच्या घरी पोहचलो जिथे आमच्या जेवण आणि राहण्याची व्यवस्था केलेली होती. त्या घरात आम्ही सामान ठेवले. श्री वरे यांनी कांदेपोहे व चहा दिला. त्याचा आस्वाद घेतल्यानंतर नितीशने उधेवाडीतील एका ऐतिहासिक मंदिर व तळे बघायला जायचा बेत आखला. आम्ही तळयापाशी पोचलो व तिथे काही मंडळी पोहायचा आनंद घेत असताना आम्ही पाहिले. दिवसभर पावसाने दगा दिल्याने उन्हाच्या काहीलीतून  साधारण ४-५ तास चालून चालून क्षीण आला होता, तो क्षीण दूर करण्यासाठी आम्ही त्या तळ्यात पोहायला जायचे ठरवले. सुदैवाने तळे फारसे खोल नसल्याने पोहता न येणाऱ्या मंडळीना मनसोक्त पोहायचा व थंडगार पाण्यात मजा करण्याचा आनंद घेता आला. पोहून बाहेर आल्यावर एकदम ताजेतवाने वाटले. तो पर्यंत तिथे किर्र अंधार झाला होता. तिथून आम्ही 'श्री वरे' यांच्या घरी गेलो तिथे जाऊन कपडे वगैरे बदलून फ्रेश झालो. उधेवाडी समुद्रसपाटीपासून साधारण २००० फुट उंचीवर आहे. आश्चर्य म्हणजे त्या गावात वीज नाही. सौरउर्जेवर चालणार्या एका दिव्याच्या मिणमिणत्या प्रकाशात आम्ही बसलो. नचिकेत,प्राची, सचिन, सर्वेश, पार्थ  इत्यादी मंडळी पत्ते कुटण्यात दंग झाली. इथे मी हर्षद, निखील, नितीश, अनघा, आकांक्षा, दीपाली  ह्यांनी मनसोक्त गप्पा मारल्या. हर्षद, नितीश ने विनोद, शाब्दिक कोट्या-कोपरखळ्या मारून सर्वांची हसून हसून पुरेवाट केली. साधारण रात्री ९ वाजता जेवण आले. आमटी भात, दोन भाज्या, लोणचे, कोशिंबीर, आणि दही असा साधा पण चविष्ट मेनू होता. रात्री वातावरणही कमालीचे गार झाले होते. त्या अंधारात आणि गारव्यात जेवताना एक वेगळीच मजा आली. जेवण झाल्यावर परत गप्पा मारल्या तसेच आकांक्षा आणि मी एक गाणे सुद्धा म्हणले. साधारण ११.३०-१२ च्या सुमारास झोपायचे ठरले. कर्णधार नितीशने सर्वांना सकाळी ६ वाजता उठायची सूचना केली. आणि आम्ही झोपी गेलो

कर्णधार नितीशच्या आज्ञेनुसार आम्ही ६ वाजता उठलो. सर्व नैसर्गिक विधी आटपून 'मनोरंजन' गडाकडे कूच करायला निघालो. साधारण तासाभरात मनोरंजन गडावर आम्ही पोचलो. एकूणच राजमाचीच्या आजूबाजूच्या परिसराला निसर्गाचे भरभरून वरदान आहे. पावसाळ्यात या निसर्गाला 'हिरव्यागार मुकुटाचा' साजच बहाल होतो आणि डोळ्यांचे पारणे फिटते, बघणारा तृप्त होऊन जातो. पठारावर हिरव्या रंगाच्याच वेगवेगळ्या shades चे मनोभावी दृश्य पाहायला मिळते. मनोरंजन पाहून झाल्यावर साधारण ९-९.३० च्या सुमारास आम्ही परत उधेवाडीत आलो. तिथे वरे यांनी कांदेपोह्याचा नाश्ता व चहा दिला. थोडावेळ विसावा घेऊन कप्तान नितीशने प्रस्तावित दुसरा गड म्हणजे 'श्रीवर्धन' गडावर कूच करायचा आदेश दिला व आम्ही मार्गस्थ झालो. मनोरंजन गडाच्या मानाने श्रीवर्धन ची वाट सोपी नव्हती, अनेक चढ उतार पार करावे लागले. आदल्या दिवशी प्रमाणे वरुणराजाची अवकृपा दुसर्या दिवशीही कायम होती (याचे खापर कृपाने निखीलने ट्रेकच्या सुरवातीला केलेल्या भाकीतावर फोडले) तसेच उन्हाचा तडाखाही कायम होता, घाम निघत होता. साधारण १.३० तासात आम्ही 'श्रीवर्धन' वर पोहचलो. आमचे ध्येय साध्य झाले होते. संतोष ने 'शिवकल्याण राजा' मधील सुप्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार करणारी आरोळी दिली व सर्वांनी त्याला जोरदार प्रतिसाद दिला. श्रीवर्धन करून पुन्हा आम्ही १.३० च्या सुमारास उधेवाडीत आलो. २ गड करून पुरत घामट निघाल्याने परत तळ्यावर पोहायचा बेत आखला गेला. १५-२० मिनिटाची वेळमर्यादा कप्तान नितीशने त्यासाठी दिली. परत मनसोक्त पोहून झाल्यावर आम्ही वरेंच्या घरी परतलो. तिथे दुपारचे जेवण घेतले. मटकीची उसळ, कोबीची भाजी, भाकऱ्या, लोणचे, भात-आमटी असा सुग्रास फक्कड बेत होता. अशा चविष्ट जेवणावर मनसोक्त ताव मारल्यावर आपापले सामान आवरून बेगा भरायचे आदेश नितीशने सर्वांना दिले. अर्धातास आवराआवर तसेच packing मध्ये गेला आणि सर्व परतीच्या मार्गाला निघायला  सज्ज झालो.

साधरण २.३० च्या सुमारास उधेवाडीला आम्ही 'जय महाराष्ट्र' केला, आणि परतीच्या वाटेला लागलो. यावेळी आमचे लक्ष्य लोणावळा नसून कर्जत हे होते. परतीचा मार्ग हा बऱ्यापैकी खडतर असा होता. लांब अंतर, मोठेमोठे उतार, त्यावर शेवाळे साचलेले, वेडेवाकडे ओबढ धोबड खडक, काही अवघड patches अशा आव्हानांनी भरून असा लांब मार्ग होता. आणि वातावरणातील भयंकर उष्मा हा अजून त्रासात भर घालत होता. पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली होती. उतरताना काही मंडळीना त्रास झाला, थकवा जाणवला. तरीपण एकमेकांना मदत करत, सांभाळून घेऊन हा खडतर मार्ग पार केला. साधारण ६.१५ च्या सुमारास पूर्ण डोंगर उतरून कर्जत जवळील 'कोंडाणे' गावापाशी आम्ही पोहचलो. तिथून आम्ही २ टमटम केल्या. आणि दोन गटात विभागून बसलो. मी बसलेल्या 'टमटम' मध्ये पुष्कर,नचिकेत,सचिन,बापट बंधू आणि दीपाली होतो. साधारण अर्धा तास जुन्या नव्या मराठी हिंदी गाण्याची मस्त मैफिलच आम्ही सर्वांनी रंगवली. पुष्करने अप्रतिमरित्या गायलेल्या बाबूजींच्या  'तोच चंद्रमा नभात' ला सर्वांनी भरभरून दाद दिली. गाणी म्हणता म्हणता कर्जत स्टेशन कधी आले हे कळलेच नाही. टमटम मधून बाहेर पाउल टाकतो रे टाकतो तोच पावसाचे आगमन झाले आणि तुफान चालू झाले. धावत आम्ही कर्जत स्टेशनच्या फलाटावर पोहचलो. ७.०० ची मुंबई ला जाणारी लोकल धरली. लोकल मध्येही नितीशने गप्पांच्या फडाचा ताबा घेत त्याच्या खास शैलीत विनोदांची खैरात करवून सर्वांना पुरेपूर हसवले. ८ वाजता डोंबिवली स्टेशन वर आम्ही उतरलो. हसऱ्या चेहऱ्याने एकमेकांचे अभिनंदन केले  व पुढील ट्रेक असेच जोशात जोमात करायचे असा मानस व्यक्त करून एकमेकांचा निरोप घेतला.             
      
टमटम

Monday, April 16, 2012

सारपास एक विलक्षण अनुभव-पूर्वार्ध

पूर्वार्ध:
साधारण जानेवारी महिन्याचा काळ होता. माझा कॉलेज मधील मित्र प्रसाद जोशी याने हिमालयीन ट्रेकिंग चा त्याचा मानस आमच्या कॉलेजच्या कॅनटीन मध्ये बोलून दाखवला. सुरुवातीला मी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. संध्याकाळी सहज बाबांच्या कानावर हा मानस घातला तर अनपेक्षितपणे मला लगेच संमती मिळाली. मग प्रसादने प्रवासाच्या तिकिटांचे आरक्षण करायची जवाबदारी घेतली, आणि जाताना-येताना दोन्ही वेळचे गरीबरथ एक्सप्रेसचे आरक्षण केले(त्याचा फायदा झाला खूप नंतर. सुखकर प्रवासाचे श्रेय मी प्रसादला देईन ) मग मी आणि बाबा साधारण फेब्रुवारी मध्ये परळ च्या युथ होस्टेलच्या ऑफिसात नाव नोंदवून आलो. त्यांनी १७ मे ची बॅच मला आणि प्रसाद ला दिली. प्रसाद बरोबर त्याचा भाऊ श्रीकांत हासुद्धा येणार होता.

मी ट्रेकची तयारी TYBcom च्या परीक्षेनंतरच करायचे ठरवले होते. २७ एप्रिलला माझी परीक्षा संपली आणि मी तयारी चालू केली. पहिल्यांदाच एवढे दिवस घराबाहेर जाणार असल्याने खूप सामान दिलेलं आई वडिलांनी. हिमालयातील थंडी लक्षात घेऊन थंडीचे कपडे आणायचं चाललेलं पण अचानक पुण्याच्या काकाकडून ते आणायचं ठरल आणि ते आई घेऊन आली. बाकी इतर बारीक सारीक वस्तू मी प्रसाद श्रीकांतनि सल्लामसलत करून घ्यायचे ठरवले. त्यात असे कळले कि आमच्याबरोबर श्रीकांतचा मित्र प्रदीप, प्रदीपचा मित्र मंदार आणि मंदारचा मित्र गौरवपण येणार आहेत. साधारण १५ तारखेला मे सगळ्या बॅग भरून ठेवल्या आणि जाण्यास सज्ज झालो.

हिमाचल च्या स्वारीवर जाण्यास सज्ज

अखेर तो दिवस उजाडला. सकाळी सर्व आप्तांना कळवून मी जेऊन आईबरोबर दुपारी १ च्या सुमारास निघालो. गरीबरथ वांद्रे टर्मिनस स्थानकातून निघते. वांद्रेपर्यंत चे तिकीट काढून २ च्या लोकलने दादर गाठले. दादरला प्रसाद, श्रीकांत आणि प्रदीप भेटले. मग आम्ही ब्रीज चढून पश्चिम रेल्वेच्या लोकलने वांद्रे गाठले. वांद्रे स्थानकात मंदार बोरिवलीहून आला. गौरवने दिल्लीकडे पश्चिम एक्सप्रेसने आधीच प्रयाण केले होते,त्यामुळे तो दिल्लीत भेटणार होता. वांद्रे स्थानक ते वांद्रे टर्मिनस हे १५ मिनिटाचे अंतर भर उन्हात आम्ही कापले. तो भाग झोपडपट्टीचा आणि अत्यंत घाणेरडा आहे. आईने कोरडा खाऊ न त्या दिवशीच रात्रीच जेवण अस भरगच्च अन्न बरोबर दिल्याने मला सामानाचा तिसरा जोड करावा लागला. आम्ही ३.३० च्या सुमारास एकदाचे वांद्रे टर्मिनस गाठले. गाडी ५.३० ची असल्याने निवांत होतो. मग एकमेकांच्या ओळखी झाल्या कारण प्रसाद आणि श्रीकांत सोडून, प्रदीप आणि मंदार मला नवीनच होते. काही वेळाने माझे आणि प्रसादचे बाबा ऑफिस मधून परस्पर वांद्रे टर्मिनसला आले. मग मी आणि प्रसाद गाडीच्या डब्यांची स्थिती पाहायला गेलो. वांद्रे टर्मिनस चे दुसरे टोक जवळपास खारच्या वेशीपर्यंत जाते. तिकडे स्टेशन मास्तरकडे चौकशी केली, तिकडे काही स्थिती कळली नाही, मग आम्ही तसेच परत आलो. साधारण ५ वाजता इलेक्ट्रोनिक इंडिकेटर वर नेमका आम्ही बसलो तिकडे आमचा ग१ डब्बा येणार होता. गाडी वेळेवर आली मग आम्ही चढलो, बेग ठेवल्या. या चौघांचे बर्थ २१-२४ असे ओळीत होते मला ७५ क्रमांकाचा बर्थ होता. पण ते आम्ही परस्पर adjust करून घेतले. ५.३० ला गाडी वांद्र्याहून रवाना झाली आणि आम्ही सर्वांचा निरोप घेतला.

आमच्या समोरच्या बर्थ वर एक गुजराती कुटुंब आल्यापासून डबा डोक्यावर घेत होते, त्यांचे वैशिट्य म्हणजे त्यांनी गाई सुटल्यापासून ते चरायला सुरुवात केली ते दिल्ली पर्यंत त्याचं चरण चालूच होत. मी मंदार,प्रसाद गप्पा मारत होतो. श्रीकांत पुस्तक वाचत बसलेला. प्रदीप बर्थवर आडवा झाला(त्याला झोपायची किती आवड आहे ते नंतर समजलच). साधारण ८.३० सुरत आलं. मग आम्ही जेवायला बसलो. मंदारचा शनिवारचा उपवास होता त्यामुळे त्याने उपवासाचा चिवडा आणलेला(नंतर चुकून बाकरवडी तोंडात टाकली आणि गिळल्यावर कळल पठठयाला उपवास आहे ते). मे मटकीची उसळ, प्रसादने परोठे, श्रीकांतने चित्रान्न(कानडी भात) आणलेला. संपवताना नाकी नऊ आले सगळ्यांच्या(शेवटी मीच संपवल सगळ). मग तासाभराने बडोदा स्थानकात मी आणि प्रदीप उतरलो तिकडे शीतपेय घेतली. १० च्या सुमारास झोपायचे ठरले, बॅगाना व्यवस्थित कुलूप लावली. मग श्रीकांत-प्रदीप सर्वात वरच्या बर्थवर, मंदार-प्रसाद मध्ये आणि मी सर्वात खालच्या बर्थवर झोपलो(झोप लागली नाही सामान चोरीला जाण्याच्या भीतीने,जग राहव म्हणून पुस्तक वाचत बसलो होतो उशिरापर्यत). मध्येच रात्री समोरच गुजराती कार्ट उठल आणि खायला मागायला लागला आईकडे त्याच्या. आश्चर्य म्हणजे आईने त्याला खाकरा दिल्या(मनात विचार आला, आमच्या आईने उत्तरपूजाच केली असती आपली) वाचता वाचता झोप कधी लागली कळलच नाही.

'दिल्ली' दरबार मध्ये

सकाळी ८.३० च्या सुमारास उठलो. तर माझ्याआधी सर्व उठलेले. उठल्यावर कळले गाडी जवळपास २ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे १०.३० च्या ऐवजी आम्ही १२.३० पर्यंत दिल्ली गाठू असे वाटले. मग आवरून सकाळी नाश्त्याला परोठे खाल्ले, मग प्रसाद मी आणि मंदार रमी खेळत बसलो(मी शिकवली त्यांना). श्रीकांत वाचनात गुंग तर प्रदीप आराम करत होता. रखडत रखडत गाडी साधारण १ च्या सुमारास हजरत निजामुद्दिन स्टेशनला पोहोचली. मग गौरवपण तिकडे आधीच पोहोचलेला असल्याने तो तिकडेच भेटला. मला खर तर दिल्लीच्या पुढील प्रवासाची काहीच idea नव्हती. ते सगळ मे प्रसादवर सोपवलेल. आम्हाला मग काश्मिरी गेट भागातील ISBT ला जायचे होते. मग आम्ही निजामुद्दीन ते नवी दिल्ली स्टेशन एका दुसऱ्या गाडीने गेलो. मी नवी दिल्ली स्टेशन पहिल्यांदाच पाहत होतो. अत्यंत गजबजलेल,विस्तीर्ण, सगळे टिपिकल उत्तर भारतीय बांधव दाटीवाटीने जागा मिळेल तिकडे ठाण मांडून बसले होते(महाराष्ट्रात पण तेच करतात). नवी दिल्लीचा भला मोठा पुल ओलांडून स्टेशनबाहेर आलो. आल्याआल्या सामना करावा लागला ते दिल्लीच्या प्रचंड उन्हाळ्याचा, त्यादिवशी तापमान ४५ होत. उन्हाच्या प्रचंड झळ्या लागत होत्या.

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला लागूनच नवी दिल्ली मेट्रोरेल्वे स्टेशन आहे. तिकडे तिकीट काढायला गेलो तर ही प्रचंड लाईन(ठाणे स्थानकापेक्षा पण जास्त म्हणजे बघा). प्रदीप,प्रसाद,मंदार तिकीट काढायला गेले. मी,श्रीकांत,गौरव (भल्यामोठ्या सामानाची) रखवालदारी करत होतो(दिल्लीत चोऱ्यामाऱ्या फार होतात अस ऐकून होतो म्हणून). अर्ध्यातासाने तिकीट घेऊन तिघं परत आले. मग आम्ही ट्रेन पकडायला प्लॅटफॉम वर निघालो तर बघितल विमानतळावर होते तशी आमची आणि आमच्या सामानाची तपासणी केली गेली. दिल्ली तशी मला फार आवडली नसली तर मेट्रोच मात्र मी खूप कौतुक करेन, गर्दीचे, सुरक्षेचे, ट्रेनच्या frequency अत्यंत सुंदर,काटेकोर नियोजन केले आहे शीला दीक्षित बाईनी. नवी दिल्ली नंतर चांदणी चौक मग लगेच काश्मिरी गेट आलं. ते मेट्रो स्टेशन म्हणजे मॉलच होता तो. नंतर आम्ही हिमाचल प्रदेश मधील ‘भून्तर’ च्या संध्याकाळच्या बसच तिकीट काढायचं ठरवल. प्रवास तसा कंटाळवाणा झाल्याने आम्हाला लक्झरी बस हवी होती, पण गर्दीचा मौसम असल्याने आम्हा सहा जणांना एका बसच तिकीट मिळाल नाही. तिथे जरा प्रदीपचे न माझे-प्रसाद चे मतभेद झाले. प्रदीप वेगवेगळ्या बसने जायला तयार होता. पण मी आणि प्रसाद ने काही झालं तरी एकत्र जायचं ह्या बाण्यावर ठाम राहिलो शेवटी तेच सर्वानी मान्य केल. मग आम्ही भून्तर साठी हिमाचल परिवहन च्या जनरल बस च(आपलं महामंडळ) तिकीट काढलं. तेव्हा साधारण दुपारचे ४ वाजले होते. जेवण झाले नसल्याने पोटात आग पडली होती सर्वांच्या, आणि त्यात उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे चांगल्या हॉटेल साठी पायपीट न करता आम्ही तिकडेच एका साध्या हॉटेलात जेवलो(ते त्याने कधी बनवल होत देव जाणे). पावती मागितली तर वरचा कर भरावा लागतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. बस ७.३० ची होती. जेवण होईपर्यंत आम्हाला ५ वाजले. वेळ कसा काढायचा हा मुख्य प्रश्न होता. उन्हाने आणि प्रवासाने हैराण असल्याने कुठे फिरायची आमची ताकद नव्हती दिल्लीत. मग काश्मिरी गेट च्या मॉलमध्ये McDonald मध्ये आम्ही गेलो. तिकडे आईस्क्रीम मी रवंथ करत २ तास खात बसलो होतो, काय करणार वेळ काढायचा होता(तिकडे अजून ठाण मांडायचं कारण मंदार-श्रीकांतला माहितीच आहे).

७.१५ ला आम्ही ISBT च्या बस स्थानकात गेलो. तिकडे बघतो तर प्रचंड मोठा आवार. अतिशय गलीच्छ, घाणेरडा, प्रचंड गोंगाट आणि प्रचंड गर्दीने गजबजलेला होता. ७ क्रमांकाच्या फलाटाला आमची भून्तर ची बस वेळेत आली. आमच्या प्रचंड सामानाला बसमध्ये ठेवायला जागा नव्हती मग कंडक्टर लं विचारून मी प्रदीप, श्रीकांत बसच्या टपावर सामान ठेवायला गेलो. सामानाला कुलुपं लावून ते दांड्याला व्यवस्थित बांधल. साधारण ८ च्या सुमारास बस रवाना झाली भून्तरला. दिल्लीच अजून एक वैशिट्य म्हणजे रुंद, चौपदरी आणि सुंदर रस्ते. बस लागायच्या भीतीने डॉक्टर श्रीकांत कडून बस न लागायच्या गोळ्या घेतल्या. दिवसभराच्या पळापळीने दमलो असल्याने मी लगेच झोपलो. अपेक्षेप्रमाणे बसच्या सीट जुनाट आणि २ सीटमधील अंतर फारच लहान होते त्यामुळे पाय अडकले होते(हा त्रास नंतर प्रत्येक बस मध्ये झाला). बाकी सगळे बस मध्ये जिथे ब्रेक घ्यायची तीकडे उतरायचे पण मी मात्र काही उतरलो नाही(थोडक्यात विकेट पडलेली).

हिमाचल प्रदेश मध्ये एन्ट्री

सकाळी ८.३० ला जाग आली तेव्हा पहिले दिसला तो घाटाचा रस्ता. अजस्त्र हिमालय, पार्वती नदीचे विशाल प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याचे पात्र, आणि आजूबाजूचा सुंदर निसर्ग. तो घाट अत्यंत वेड्यावाकड्या वळणांचा आणि अरुंद होता. रात्रभर अरुंद सा वरून बसून पूर्ण अंग धरले होते. पायाची तर पुरती वाट लागलेली(वाटल भून्तरला उतरल्यावर हाडांचा हिशोब जमवावा.) अखेरीस मंडी शहर ओलांडून आम्ही ९ च्या सुमारास भून्तर गाठले. रात्री जेवलो नसल्याने कडकडीत भूक लागलेली. तिकडे एका छोटेखानी धाब्यावर गरम गरम परोठे आणि जिलेबीचा नाश्ता केला. दिल्लीतील प्रचंड उष्म्याचा, २ दिवसाच्या प्रवासाचा त्रास इकडल्या हवेतील गारव्याने खूप कमी झाला. गार हवेत गरम चहा प्याय्लावर फारच फ्रेश वाटल. मग मंदार प्रदीप गौरव काही खरेदी करायला भून्तर च्या बाजारात गेले. मग मी आणि प्रसाद भून्तर फिरायला गेलो. अतिशय छोटे, सुंदर, पंधरा हजार वस्तीचे गाव. जवळपास सर्व गोरे लोक, घरे पण छोट्या आकाराची आणि नियोजनबद्ध. आता इंटरनेट सारखी सोय पण या दुर्गम गावात आहे. हिमाचल प्रदेश च्या हवामानाचे वैशिट्य म्हणजे इकडे हवा मिनिटा मिनिटाला बदलते. घटकेत मळभ दाटून येत, तर मध्येच उन. कधी जोरदार पाऊस. सगळच अनिश्चित. मी तिकडे एक जर्सी विकत घेतली एक आठवण म्हणून. खर तर युथ होस्टेल चा बेस कॅम्प हा ‘कसोल’ गावात होता, जे भून्तर पासून तासभर आहे. मग सगळ्याचं आवरून झाल्यावर आम्ही ‘कसोल’ ची बस पकडली आणि साधारण ११-११.३० ला युथ होस्टेल च्या बेस कॅम्प वर पोहोचलो.

जवळपास अडीच दिवस प्रवास करून आम्ही कसोल गाठले. तिकडे आम्हाला पहिले reporting करायचं होतं. सगळ्या कागदी औपचारिकता पूर्ण केल्या. आमच्या बॅचचे नाव होते SP-17. याचा अर्थ सारपास लं जाणारी युथ होस्टेल ची १७ वी बॅच. आम्हाला ६ नंबरचा टेंट मिळाला. तिकडे आधीच्या बॅचचे काही लोक होते जे आदल्या दिवशी आलेले. मग आम्हाला Blankets, Sleeping bags, Rucksack दिल्या गेल्या. साधारण १२.३० च्या सुमारास जेवण मिळाले. इथे एक विशेष सांगावेसे वाटते कि अख्ख्या ट्रेक मध्ये कधीही जेवण उशिरा किवा कमी मिळाले असे झाले नाही. खाण्यापिण्याचे नियोजन अत्यंत सुंदर पद्धतीने केल्याबद्दल युथ होस्टेल च्या स्टाफला सलाम!!.

त्या दिवशी आम्हाला काही कार्यक्रम नव्हता. मग दुपारी आम्ही विश्रांती घेतली. संध्याकाळी मे सोडून सगळे जवळच्याच प्रसिद्ध ‘मणीकर्ण’ येथील गरम पाण्याच्या कुंडात अंघोळीला गेले(मी प्रवासाला कंटाळलेलो असल्याने मी अंघोळीला गोळी दिली). थोडावेळ टेंट मध्ये वाचन करत बसलो. मग कंटाळा आल्याने एकटाच फेरफटका मारायला निघालो कॅम्पचा. श्रीकांत ने त्याचा मोबाईल माझ्याकडे दिलेला असल्याने मी कॅम्प च्या आवाराचे फोटो काढत होतो. कॅम्प ची जागा ही प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पार्वती नदीच्या काठाशी होती. निसर्गाने सौंदर्याचे दान भरभरून टाकलेली जागा होती ती. नदीच्या खळखळत्या पाण्याचा प्रचंड आवाज सतत येत होता(रात्री हा आवाज भयानक वाटतो). मग तिकडे आनंद सोमण नावाचे ठाण्याचे गृहस्थ मला भेटले(कुणीतरी मराठी माणूस भेटल्याचा आनंद झाला). मग बोरिवलीचे पंकज-अर्जीन्दर सिंग यांचा ग्रुप, आमच्या टेंट मधील भावनगरच्या गुजराती बांधवांचा ग्रुप, मुंबईच्या कविता-नेहा यांचा ग्रुप, बेंगलोर च्या अदिती इन्फोटेक कंपनीच्या विभा-महेश, आनंद-ह्युबी यांचा ग्रुप, यांच्याशी ओळख झाली(बाकीच्यांची ओळख दुसऱ्या दिवशी झालीच). आमची ५० जणांची बॅच होती. तेवढ्यात हे पाच जण अंघोळ करून परत आले. मग दुपारी चहा झाला. रात्री ८.३० ला जेवण आणि नंतर ‘कॅम्प फायर’ होती. ती एन्जोय करून आम्ही १० वाजता Bournvita(युथ होस्टेलच देते) पिऊन झोपलो.

बेस कॅम्प-प्रारंभ

२० मे

सकाळी ५ वाजता शिट्टी वाजली आणि तेव्हापासून चालू झाले ते ‘शिटीमय’ आयुष्य. कारण सगळ्या गोष्टी शिट्या च्या तालावर होणार होत्या पुढचे सर्व दिवस. आम्ही उठलो, अर्ध्या तासात आवरल सगळ, आणि सकाळचा चहा घेऊन ६ वाजता रिपोर्ट करायचं होत. (नेहमीप्रमाणे)मी आणि श्रीकांत ने १० मिनिटे उशिर केला. पण पहिला दिवस असल्याने जास्त कुणी बोलले नाही. आम्हाला कॅम्प वरून जोग्गिंग करत करत अर्ध्या-एक किलोमीटर वरील मोकळ्या मैदानात नेले गेले. मी सुरुवातीला माझ्या ग्रुप बरोबर होतो मग पळत पळत सगळ्यात पुढे असलेल्या मिलिटरी मधील पंकज बरोबर सामील झालो. तसा माझा stamina चांगला असल्याने आम्ही दोघ बरोबर जोग्गिंग करत होतो. आणि सर्वात पहिले मैदानात पोहोचलो. मग युथ होस्टेल च्या ट्रेनरने बर्फात ट्रेकिंग करण्यासाठी फिट राहावे म्हणून जोरदार वॉर्म अप एक्सरसाईज करून घेतला. बरेच दिवसाने एवढा व्यायाम केल्याने जरा पाय दुखायला लागले(पण नंतर त्याचा खूप उपयोग झाला).

साधारण ७.३० पर्यंत आम्ही परत बेस कॅम्पवर परत आलो. मग नाश्ता झाला, टेंट साफ केला. त्या दिवशी आमच्या बॅचला रात्रीच्या कॅम्प फायर मध्ये कार्यक्रम सादर करायचा होता(हा नियमच आहे, प्रत्येक बॅचला कराव लागत). मग मला तिकडे काहीतरी मराठी गाण सादर करायचा प्लान डोक्यात आला. मग ‘जय जय महाराष्ट् माझा’ हे गाण मी सुचवले. पण प्रसाद-मंदार कडून मला विरोध झाला(त्यांना वाटले बरोबर वाटणार नाही ते गाण, कारण आम्ही हिमाचलमध्ये होतो आणि बाकीचे लोक दुखावले जातील अस त्यांना वाटले). मी सुरुवातीला उडवून लावलं त्यांना, मग मी विचार केला जाऊदे नको उगाच राडा!! म्हणून सेटलमेंट म्हणून ‘कोंबडी पळाली’ गायचं ठरल. पण त्यासाठी गरज होती ती गायिकेची जीला हे गाण येत किवा मराठी येणाऱ्या मुलीची. मग मी कविता आणि नेहाला कल्पना सांगितली त्यांनी होकार दिला. माझी गाणी पाठ असल्याने मी त्यांना शब्द लिहून दिले, आम्ही तालमी केल्या. मग ते गाण बसल. बाकी माझे मित्र या गाण्याला कोरस देणार होते. पण महाराष्ट् गीत गायचं माझ्या मनात कुठेतरी होत. मी जशी संधी मिळेल तस गायचच अस ठरवल. नेहमीप्रमाणे ८.३० ला जेवण झाले. मग चालू झाली ती कॅम्प फायर. सुरुवातीलाच कर्नाटक च्या १० जणांनी त्याचं राज्याच गीत ‘जय कर्नाटक माते’ चालू केल आणि आपली मराठी खोपडी सणकली. मी तिथे मित्रांना फर्मान सोडल मी महाराष्ट्र गीत गाणारच तुम्हाला साथ द्यायची तर द्या नाहीतर नका देऊ. माझ सादरीकरण शेवटी होत त्यामुळे मधल्या वेळात इतरांचे कार्यक्रम चालू असताना मी महाराष्ट्र गीतासाठी फिल्डिंग लावायला चालू केली. जो मराठी दिसेल त्यांना सामील व्हायला सांगितले. अगदी आमचे लीडर सोमणकाका पण तयार झाले. पण त्या आधी होता ‘कोंबडी’ चा पर्फोर्मंस. मी, कविता-नेहा अस तिघ मिळून ते गाण दणक्यात गायलो. मग थोडा वेळ उरलेला होतं मग मी आयोजकांना विनंती केली अजून एक गाण्यासाठी. लगेच ५ मिनिटांनी अवधूत गुप्तेचे ‘महाराष्ट्र गीत’ मी चालू केले, हळूहळू बरेच जण आमच्या पाठी कोरसला येऊन उभे राहिले आणि ते गाण तुफान म्हणल गेल. (कानडी, पंजाबी, गुजराती इत्यादी सर्वाना महाराष्ट्र गीत समजल काय आहे ते. जेव्हा परत चुकून कुणी ऐकलच त्यापैकी तर माझी आठवण नक्कीच काढतील). मग मी महाराष्ट्र आणि शिवाजी महाराजांच्या नावाने घोषणा देऊन तो परिसर दणाणून सोडला. मगच सुखाने झोपलो रात्री. एक वेगळेच समाधान मिळाले.