सकाळी ८.३० च्या सुमारास उठलो. तर माझ्याआधी सर्व उठलेले. उठल्यावर कळले गाडी जवळपास २ तास उशिराने धावत आहे. त्यामुळे १०.३० च्या ऐवजी आम्ही १२.३० पर्यंत दिल्ली गाठू असे वाटले. मग आवरून सकाळी नाश्त्याला परोठे खाल्ले, मग प्रसाद मी आणि मंदार रमी खेळत बसलो(मी शिकवली त्यांना). श्रीकांत वाचनात गुंग तर प्रदीप आराम करत होता. रखडत रखडत गाडी साधारण १ च्या सुमारास हजरत निजामुद्दिन स्टेशनला पोहोचली. मग गौरवपण तिकडे आधीच पोहोचलेला असल्याने तो तिकडेच भेटला. मला खर तर दिल्लीच्या पुढील प्रवासाची काहीच idea नव्हती. ते सगळ मे प्रसादवर सोपवलेल. आम्हाला मग काश्मिरी गेट भागातील ISBT ला जायचे होते. मग आम्ही निजामुद्दीन ते नवी दिल्ली स्टेशन एका दुसऱ्या गाडीने गेलो. मी नवी दिल्ली स्टेशन पहिल्यांदाच पाहत होतो. अत्यंत गजबजलेल,विस्तीर्ण, सगळे टिपिकल उत्तर भारतीय बांधव दाटीवाटीने जागा मिळेल तिकडे ठाण मांडून बसले होते(महाराष्ट्रात पण तेच करतात). नवी दिल्लीचा भला मोठा पुल ओलांडून स्टेशनबाहेर आलो. आल्याआल्या सामना करावा लागला ते दिल्लीच्या प्रचंड उन्हाळ्याचा, त्यादिवशी तापमान ४५ होत. उन्हाच्या प्रचंड झळ्या लागत होत्या.
नवी दिल्ली रेल्वे स्टेशनला लागूनच नवी दिल्ली मेट्रोरेल्वे स्टेशन आहे. तिकडे तिकीट काढायला गेलो तर ही प्रचंड लाईन(ठाणे स्थानकापेक्षा पण जास्त म्हणजे बघा). प्रदीप,प्रसाद,मंदार तिकीट काढायला गेले. मी,श्रीकांत,गौरव (भल्यामोठ्या सामानाची) रखवालदारी करत होतो(दिल्लीत चोऱ्यामाऱ्या फार होतात अस ऐकून होतो म्हणून). अर्ध्यातासाने तिकीट घेऊन तिघं परत आले. मग आम्ही ट्रेन पकडायला प्लॅटफॉम वर निघालो तर बघितल विमानतळावर होते तशी आमची आणि आमच्या सामानाची तपासणी केली गेली. दिल्ली तशी मला फार आवडली नसली तर मेट्रोच मात्र मी खूप कौतुक करेन, गर्दीचे, सुरक्षेचे, ट्रेनच्या frequency अत्यंत सुंदर,काटेकोर नियोजन केले आहे शीला दीक्षित बाईनी. नवी दिल्ली नंतर चांदणी चौक मग लगेच काश्मिरी गेट आलं. ते मेट्रो स्टेशन म्हणजे मॉलच होता तो. नंतर आम्ही हिमाचल प्रदेश मधील ‘भून्तर’ च्या संध्याकाळच्या बसच तिकीट काढायचं ठरवल. प्रवास तसा कंटाळवाणा झाल्याने आम्हाला लक्झरी बस हवी होती, पण गर्दीचा मौसम असल्याने आम्हा सहा जणांना एका बसच तिकीट मिळाल नाही. तिथे जरा प्रदीपचे न माझे-प्रसाद चे मतभेद झाले. प्रदीप वेगवेगळ्या बसने जायला तयार होता. पण मी आणि प्रसाद ने काही झालं तरी एकत्र जायचं ह्या बाण्यावर ठाम राहिलो शेवटी तेच सर्वानी मान्य केल. मग आम्ही भून्तर साठी हिमाचल परिवहन च्या जनरल बस च(आपलं महामंडळ) तिकीट काढलं. तेव्हा साधारण दुपारचे ४ वाजले होते. जेवण झाले नसल्याने पोटात आग पडली होती सर्वांच्या, आणि त्यात उन्हाचा तडाखा जाणवत होता. त्यामुळे चांगल्या हॉटेल साठी पायपीट न करता आम्ही तिकडेच एका साध्या हॉटेलात जेवलो(ते त्याने कधी बनवल होत देव जाणे). पावती मागितली तर वरचा कर भरावा लागतो हे पहिल्यांदाच पाहत होतो. बस ७.३० ची होती. जेवण होईपर्यंत आम्हाला ५ वाजले. वेळ कसा काढायचा हा मुख्य प्रश्न होता. उन्हाने आणि प्रवासाने हैराण असल्याने कुठे फिरायची आमची ताकद नव्हती दिल्लीत. मग काश्मिरी गेट च्या मॉलमध्ये McDonald मध्ये आम्ही गेलो. तिकडे आईस्क्रीम मी रवंथ करत २ तास खात बसलो होतो, काय करणार वेळ काढायचा होता(तिकडे अजून ठाण मांडायचं कारण मंदार-श्रीकांतला माहितीच आहे).
७.१५ ला आम्ही ISBT च्या बस स्थानकात गेलो. तिकडे बघतो तर प्रचंड मोठा आवार. अतिशय गलीच्छ, घाणेरडा, प्रचंड गोंगाट आणि प्रचंड गर्दीने गजबजलेला होता. ७ क्रमांकाच्या फलाटाला आमची भून्तर ची बस वेळेत आली. आमच्या प्रचंड सामानाला बसमध्ये ठेवायला जागा नव्हती मग कंडक्टर लं विचारून मी प्रदीप, श्रीकांत बसच्या टपावर सामान ठेवायला गेलो. सामानाला कुलुपं लावून ते दांड्याला व्यवस्थित बांधल. साधारण ८ च्या सुमारास बस रवाना झाली भून्तरला. दिल्लीच अजून एक वैशिट्य म्हणजे रुंद, चौपदरी आणि सुंदर रस्ते. बस लागायच्या भीतीने डॉक्टर श्रीकांत कडून बस न लागायच्या गोळ्या घेतल्या. दिवसभराच्या पळापळीने दमलो असल्याने मी लगेच झोपलो. अपेक्षेप्रमाणे बसच्या सीट जुनाट आणि २ सीटमधील अंतर फारच लहान होते त्यामुळे पाय अडकले होते(हा त्रास नंतर प्रत्येक बस मध्ये झाला). बाकी सगळे बस मध्ये जिथे ब्रेक घ्यायची तीकडे उतरायचे पण मी मात्र काही उतरलो नाही(थोडक्यात विकेट पडलेली).
No comments:
Post a Comment